महाबीज च्या गलथान कारभाराची कृषी मंत्र्याकडे केली तक्रार...
चिखली:- हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनीही "शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका" असे निर्देश स्वराज्य स्थापनेच्या वेळी दिले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊनच देवा भाऊंच्या सरकारकडून शासन चालवले जात आहे. महाबीज कडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तर महाबीज काय कुणीही असला तर त्याची गय केली जाणार नाही! असे उद्गार आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी काढले.
राज्य शासनामार्फत वीस गुंठे ते एक हेक्टर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र बियाणे अनुदान योजना राज्य शासनाने मंजूर केलेली आहे या योजनेअंतर्गत तूर मूग उडीद सोयाबीनचे सुधारित व प्रमाणित केलेले बियाणे शंभर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना दिल्या जाते या योजनेमुळे शेतकऱ्यांना सुधारित व दर्जेदार बियाणे उपलब्ध होते शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होते व शाश्वत शेतीला चालना मिळते तसेच अल्पभूधारक शेतकरी हा प्रगत शेतीकडे वळतो. या योजनेअंतर्गत ल्पभूधारक शेतकऱ्यांना हेक्टरी 75 किलो सोयाबीनचे सुधारित प्रमाणित केलेले बियाणे हे शंभर टक्के अनुदानावर दिल्या जाते सदर बियाणे शेतकऱ्यांना वितरित करण्याची जबाबदारी ही महाबीजची आहे. महाबीज त्यांच्या वितरकाद्वारे शेतकऱ्यांना हे बियाणे पुरवतात. सोयाबीनचे बियाणे पॅकिंग करण्यासाठी केंद्र शासनाने काही निर्देश दिलेले आहे त्या अंतर्गत सोयाबीनचे बियाणे पॅकिंग करताना 22 किलो, 25 किलो, 30 किलो असे प्रतिबॅग प्रमाण असावे अशी केंद्र शासनाचे निर्देश आहे.
असे असताना सुद्धा बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाबीज कडून शेतकऱ्यांना सरसकट 22 किलोची बॅग दिल्या जात आहे त्यामुळे 75 किलोच्या बियाण्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना फक्त 66 किलो बियाणे मिळत आहे त्यामुळे नऊ किलो बियाणे अल्पभूधारक शेतकऱ्यांना कमी मिळत आहे. चिखली तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी याची तक्रार आमदार श्वेता ताई महाले यांच्याकडे केली असता शेतकऱ्यांच्या या तक्रारीची गंभीर दखल घेऊन आमदार श्वेता ताई महाले यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना लेखी निवेदन दिले आहे.
चिखली तालुक्यातील तसेच बुलढाणा जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आमदार श्वेता ताई महाले या आक्रमक झाल्या आहेत.