अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषात साजरा
( प्रतिनिधी ) चिखली शुक्रवार ६ जून २०२५,
६ जून १६७४ साली रायगडावर पार पडलेला राज्याभिषेक केवळ एका व्यक्तीचा नव्हता, तर तो जनतेच्या स्वाभिमानाचा, स्वराज्याच्या मूल्यांचा आणि नवभारताच्या स्वप्नाचा आरंभबिंदू होता असे प्रतिपादन इंजी. तुषारजी यांनी केले.
स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात संपन्न झाला, सर्व प्रथम छत्रपती शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवराज्याभिषेक सोहळ्याची ध्वनी चित्रफित दाखवत व छत्रपती शिवाजीमहाराज यांची समाधी शोधून काढणारे महात्मा ज्योतीबा फुले यांच्यावर पोवाडा सादर करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे प्राचार्य डॉ.अरूण नन्हई होते तर प्रमुख वक्ते म्हणून इंजि. तुषारजी बोलत होते. पुढे ते म्हणाले की "मी मेलो तरी चालेल, पण हे राज्य झाले पाहिजे" हे वाक्य केवळ शिवरायांच्या निर्धाराचं नाही, रयतेतील प्रत्येकांच्या अपेक्षांचं प्रतिबिंब होतं. शिवरायांचं स्वराज्य हे कुणा एका वर्गासाठी नव्हतं – ते सर्व जाती-धर्मातील कष्टकरी रयतेसाठी होतं. "रयत म्हणजे कोण?" – हा प्रश्न आजही महत्त्वाचा आहे. रयत म्हणजे, खांद्यावर नांगर घेऊन शेतात राबणारा शेतकरी, वाड्यांमध्ये मजुरी करणारी स्त्री, बाजारात वस्तू विकणारा व्यापारी, आणि गडावर रणशूरपणे झुंजणारा मावळा.
शिवरायांनी या रयतेला फक्त करदातं नाही केले तर स्वराज्याच्या लढाईत सहभागी करून घेतलं. तसेच १६३० च्या सुमारास पुणे परगणा आदीलशाहीकडून उद्ध्वस्त झाला. जगदेवराव सारख्या सरदाराने पुण्याच्या रस्त्यांवर गाढवांचा नागर फिरवून, काठीला चपला लावून गावाचा अपमान केला. अशा काळात शहाजीराजांनी पुण्याची जबाबदारी जिजाऊ माँसाहेब आणि बाल शिवाजी यांच्यावर सोपवली.त्यांनी फक्त पुण्याचं पुनरुत्थान केलं नाही, तर स्वराज्याच्या बीजांची पेरणी केली. बाल शिवाजीने पुण्यावर सोन्याचा नागर फिरवला, आणि लोक परत यायला लागले, शेती सुरू झाली. शिवरायांनी शेतकऱ्यांच्या नावावर जमिनींचं वितरण करून त्या काळात भूमिहीनांना आत्मसन्मान दिला. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला पकडल्यानंतर तिला सन्मानाने परत पाठवून, "माझ्या दृष्टीनं तू आईसारखी आहेस" असं सांगणाऱ्या शिवाजी महाराजांची ओळख जगाला वेगळी ठरली. शिवरायांच्या दरबारात सर्व जाती-धर्मातील लोकांना स्थान होतं. त्यांच्या सैन्यात मुस्लीम सरदार, त्यांच्या प्रशासनात बहुजन अधिकारी, आणि त्यांच्या न्यायशास्त्रात सर्व घटकांना समान वागणूक दिली जात होती. शिवाजी महाराजांवर संत तुकाराम, व समकालीन संतांचा प्रभाव होता. "जे काय रंजले-गांजले" हे तुकाराम महाराजांचं तत्त्व शिवरायांनी राज्यकारभारात उतरवलं. आज अनेक गडांवर शिवरायांचे पुतळे आहेत, पण शिवाजी महाराजांचा जगातला त्यांच्या हयातीत बांधलेला पहिला पुतळा बेलोरी गावात उभारला गेला. हा पुतळा एका स्त्रीने – गडकरी सावित्रीबाई देसाई यांनी उभा केला असेही ते म्हणाले.
शिवाजी महाराजांनी सत्ता ही जनतेसाठी वापरली. पण आज आपल्याकडे अनेक ठिकाणी सत्ता ही स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्यात येते. न्यायाऐवजी राजकारण, सेवेऐवजी गर्व, आणि रयतेच्या अपेक्षांऐवजी वैयक्तिक हिशेब — ही स्थिती शिवराज्याच्या तत्वांशी फारकत घेणारी आहे. शिवराज्याभिषेक दिन फक्त जयजयकाराचा, उत्सवाचा किंवा ऐतिहासिक आठवणींचा दिवस नसून तो एक "आत्मपरीक्षणाचा" क्षण आहे. म्हणूनच शिवराज्याभिषेक दिन म्हणजे केवळ स्मरण नव्हे, तर आत्मपरीक्षण असे प्राचार्य डॉ.अरूण नन्हई म्हणाले.
तसेच स्वराज्याच्या रक्षणार्थ सामुहिक शपथ व कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. राजेंद्र कोकाटे यांनी केले. यावेळेस संस्थेतील प्राध्यापक व शिक्षककेतर कर्मचारी उपस्थित होते.