“सात दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा करा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन” – रवी पेटकर
चिखली /( प्रतिनिधी ) - वाढत्या उष्णतेमुळे चिखली शहरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, गेल्या काही दिवसांपासून शहरात कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पिण्याच्या तसेच दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच सततच्या विजेच्या लपंडावामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहर प्रमुख रवी पेटकर यांनी पाणीपुरवठा विभागाकडे विनंती वजा निवेदन सादर केले आहे. शहरातील नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा, तसेच कमी दाबाने येणाऱ्या पाण्याची समस्या तात्काळ सोडवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
रवी पेटकर यांनी प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम देत, या कालावधीत पाणीपुरवठ्याची समस्या न सुटल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांचे हाल होत असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.
सदर निवेदनावर चिखली शिवसेना शहर संघटक प्रीतम गैची, युवासेना शहर प्रमुख आनंद गैची, युवासेना उपशहर प्रमुख शंभू गाडेकर, समाधान जाधव, अनिल जावरे ,संतोष बापू देशमुख ,उमेश झोरे ,ज्ञानेश्वर लोखंडे, पुंजाजी मामा शेळके, शेख सोहेल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
