नितीन फुलझाडे
चिखली: राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार मागील 5 दिवसांपासून नाफेड नोंदणी केंद्रे सुरु करण्याचे निर्देश दिलेले आहेत. मात्र चिखली तालुक्यात सध्या केवळ एका ठिकाणीच नोंदणी केंद्र सुरु करण्यात आले आहे. परिणामी तालुक्यातील इतर गावांतील शेतकऱ्यांना नोंदणीसाठी मोठा प्रवास करावा लागत आहे. तसेच गर्दीमुळे नोंदणी प्रक्रियेत अडथळे येत आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता, चिखली तालुक्यातील सर्व प्रमुख ठिकाणी तात्काळ नाफेड नोंदणी केंद्रे सुरु करण्यात यावे, अशी मागणी चिखली तालुका काँग्रेस किसान सेलच्या वतीने करण्यात आली आहे.
मंगळवार ४ नोव्हेंबर रोजी तहसीलदार व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चिखली यांना निवेदन देण्यात आले. शासन स्तरावरुन तालुक्यात नाफेड केंद्र तातडीने सुरु करण्यात यावे, अन्यथा किसान सेलच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
याप्रसंगी चिखली तालुका काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष समाधान आकाळ, योगेश ढोरे, संजय गवई, गणेश गवई, संगम मोदी, ऋषिकेश अंभोरे, रमेश घनघाव प्रल्हाद जोशी, गणेश शेजुळ, विनायक भुसारी बळीराम गवई नितीन शिंदे, सुरेश मुरकुटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
