खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेतकरी भवन धाड येथे घेतलेल्या बैठकीत प्रशासनाला सज्जतेच्या सूचना:
चिखली:- शेतीला व शेतकऱ्याला निव्वळ निसर्गाच्या भरवशावर न सोडता विज्ञानाच्या साहाय्याने शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी पंचायत समिती अंतर्गत कृषी विभागाची रचना करण्यात आलेली असून कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. बळीराजाला खते बी बियाणे इत्यादी सुविधा घरपोच प्राप्त होतील या अनुषंगाने सोयी करायला हव्यात, त्याचप्रमाणे शेतीला लागणारे निविष्ठांचा अवैध साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण करायची व भाव वाढवायचे असा कोणताही प्रकार आपण खपवून घेणार नाही, या देशातील सर्व संसाधनावर पहिला हक्क निर्मात्या शेतकऱ्याचा असून, बळीराजाला त्रासदायक होईल असा कोणताही लाल फीतशाहीचा कारभार आपण सहन करणार नाही अशी सज्जड दम वजा सूचना आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी आज शेतकरी भवन सभागृहात धाड येथे तालुकास्तरीय खरीप हंगाम 2025-26 पूर्वनियोजन आढावा बैठक घेतली आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. 2025 26 च्या खरीप हंगामाच्या पूर्व नियोजन आढावा बैठकीला संबोधित करताना आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी कृषी अधिकारी व कृषी विभाग यांना शेतकरी हितासाठी काही मौलिक सूचना प्रदान केल्या.
🎯 साठा उपलब्ध करा, साठेबाजी रोखा:
तालुक्यात बियाणे व खतांचा पुरेसा साठा वेळेवर उपलब्ध करणे, बियाणे व खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या.
🎯 रुंद सरी वरंब्यावर पेरणी आवश्यक:
महाराष्ट्रात पावसाची सुरुवात लवकर होण्याची शक्यता असून पेरण्या लवकर होतील असा हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे. तरी कृषि विभागाचे सर्व कर्मचारी/अधिकारी व शेतीशी संबधित सर्व घटक यांनी पूर्वतयारी म्हणून ही बाब सर्व शेतकरी बांधवांना सांगून सर्व शेतकऱ्यांना रुंद सरी वरंब्यावर पिकांची पेरणी करण्यास प्रोत्साहित करावे. त्यामुळे अवर्षण काळात पिकांच्या मुळाशी पुरेसा ओलावा राहून उत्पादनात घट येणार नाही. तसेच जास्त पाऊस, अतिवृष्टी झाल्यास पाणी सरीवाटे वाहून जाऊन पिकांचे नुकसान होणार नाही.
🎯 सोयाबीनकडे लक्ष द्या:
सोयाबीन हे चिखली तालुक्यातील खरिपाचे प्रमुख पीक आहे. त्यामुळे महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ (NSC), विविध बीजोत्पादन कंपन्या, बियाणे विक्रेते यांच्या मार्फत सोयाबीनचे सुधारित व उन्नत वाणांचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावे, त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील वर्षाच्या पेरणीसाठी घरचे हक्काचे बियाणे उपलब्ध होईल व सोयाबीनच्या उत्पादकतेत वाढ होईल. तसेच सर्व पिकांच्या बियाणे उगवणीबाबत तक्रार आल्यास तातडीने दखल घेऊन सर्व्हेक्षण करण्यात यावे व वस्तुनिष्ठ अहवाल तत्काळ शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावेत. म्हणजेच शेतकऱ्यांना वेळेत योग्य ती कायदेशीर कार्यवाही करता येईल.
🎯 रोगांना आळा घाला:
चिखली तालुक्यामध्ये सर्व बीजप्रक्रिया मोठ्या प्रमाणात करून घेण्यात यावी. जैविक तसेच रासायनिक बियाण्यास बीजप्रक्रिया केल्यामुळे पिकांची उगवण एकसारखी होते. शेतीपिकांची उगवण झाल्यानंतर प्राथमिक अवस्थेमध्ये पिकांवर होणारा रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो.
🎯 फळपिकांची लागवड व्हावी:
तालुक्यात फलोत्पादन पिकांच्या लागवडीवर भर देण्यात यावा. फलोत्पादन पिके पर्यावरणपूरक आहेत. पर्यावरण रक्षणाचे काम करतात. त्यामुळे 'भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना', महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, पोकरा इत्यादी योजनांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनुदान तत्त्वावर फळपिकांची लागवड करण्यात यावी. तसेच या वर्षी शासनाने बांबू पिकांच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान घोषित करून प्रोत्साहन देण्याचे धोरण बनविले आहे. त्यामुळे चिखली तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बांबू पिकांच्या लागवडीविषयी प्रचार व प्रसिद्धी करून बांबूची लागवड वाढविण्यावर भर देण्यात यावा.
🎯 खते द्या, लिंकिंग थांबवा:
शेतकऱ्यांच्या रासायनिक खतांच्या मागणीनुसार खतांची उपलब्धता राहील याची दक्षता घेण्यात यावी. रासायनिक खते, बियाणे, इत्यादींबाबत लिंकिंग तसेच काही गैरप्रकार, तक्रारी इत्यादींसाठी दक्षता पथके तैनात ठेवण्यात यावीत. त्यांचे संपर्क क्रमांक विविध माध्यमांद्वारे सार्वजनिक करण्यात यावेत.
🎯 पीकविमा आवश्यकच:
चिखली तालुक्यामध्ये पिकविमा योजनेची प्रचार प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात करण्यात यावी. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीकविमा योजनेत सहभाग घेण्यास प्रोत्साहित करावे.
🎯 पीककर्ज पेरणीपूर्वी द्या:
शेतकऱ्यांना पीक कर्ज पेरणीपूर्वी वेळेत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था बँका व सहकार विभागाने करावी. कुठलाही पात्र शेतकरी पीककर्जापासून वंचित राहता कामा नये.
🎯 अनुदान थेट खात्यात जमा करा:
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत सर्व शेतकऱ्यांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी. पावसामध्ये खंड पडल्यास तातडीने करावयाच्या उपाययोजनाची शेतकऱ्यांना तातडीने माहिती देऊन जागृती करावी.
🎯 जनजागृतीसह योजना पोहचवा:
तालुक्यामध्ये सर्व पिकांवर येणाऱ्या किडी व रोगांची शेतकऱ्यांना वेळोवेळी माहिती देऊन जनजागृती करण्यात यावी.
तसेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण 'गोपीनाथ मुंडे अपघात विमा', कृषी सोलर पंप, पीक विमा आदी योजनांचा लाभ घरोघरी पोहोचवण्याच्याही सूचना यावेळी संबंधितास देण्यात आल्या.
याप्रसंगी बुलढाणा तालुका कृषी अधिकारी, यांच्यासह अनिल जाधव, सुनील देशमुख, संदीप उगले, किरण सरोदे, गजानन देशमुख,अरुण पाटील, दिगंबर जाधव, बबन सुसर, राजू चांदा , किरण धंदर, योगेश राजपूत, विशाल विसपुते, बबलू वाघुर्डे,सुरेश चौधरी,गणेश बाजी व इतर नागरिक उपस्थित होते.