विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान : आर्यनंदी पतसंस्थेची गौरव परंपरा कायम

 


मान्यवरांचा सत्कार आणि सामाजिक योगदानाचा उत्सव: चिखलीत विशेष सत्कार समारंभ संपन्न 


नितीन फुलझाडे 

चिखली :  चिखली तालुक्यातील अग्रगण्य सहकारी संस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या आर्यनंदी अर्बन पतसंस्थेच्या वतीने दि. ७ मे रोजी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ संस्थेच्या सभागृहात उत्साहात पार पडला. गेल्या ३० वर्षांपासून सहकार, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी ही पतसंस्था सामाजिक उपक्रम राबवण्याबरोबरच समाजाच्या हितासाठी कार्यरत आहे.

पार पडलेल्या या सत्कार समारंभात चिखली पोलिस ठाण्याचे ठाणेदार श्री. संग्रामसिंह पाटील यांचा पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच चिखली नगरपालिकेचे अभियंता श्री. श्रीपाद भालेराव यांना सेवानिवृत्तीबद्दल गौरविण्यात आले. बुलडाणा जिल्हा पारिक समाजाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल श्री. राजेंद्रजी व्यास यांचा तसेच भाजप चिखली शहराध्यक्षपदी निवड झालेल्या श्री. सागर पुरोहित यांचाही सन्मान करण्यात आला. याशिवाय बुलडाणा जिल्हा पारिक समाजाचे कोषाध्यक्ष म्हणून विजय तिवारी यांची निवड झाल्याबद्दलही त्यांचे अभिनंदन करण्यात आले. संस्थेसाठी नेहमी सहकार्य करणारे सहाय्यक निबंधक राजेंद्र घोंगे यथोचित सत्कार करण्यात आला.

सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते आर्यनंदी महाराज, खटकेश्वर महाराज आणि रेणुकामाता यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष  सुरेशआप्पा खबुतरे यांच्या हस्ते मान्यवरांना पुष्पगुच्छ, शाल, आणि श्रीफळ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

 सत्कारानंतर श्री. संग्रामसिंह पाटील, श्री. श्रीपाद भालेराव आणि श्री. राजेंद्रजी व्यास यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी आर्यनंदी पतसंस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले आणि संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष श्री. सुरेशआप्पा खबुतरे यांनी त्यांच्या मनोगतात संस्थेच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “ग्रामीण भागातील गरजूंना मदत करण्यासाठी तसेच आर्थिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात योगदान देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. ही संस्था सामान्य जनतेची, त्यांच्या गरजांची सोबत करणारी आहे.”

या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व संचालक मंडळ, कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष श्री. विजय खरात यांनी केले, तर व्यवस्थापक श्री. राजेंद्र गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रमाच्या शेवटी संचालक मंडळाच्या वतीने सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार व्यक्त करण्यात आले.  आर्यनंदी पतसंस्थेचा हा सत्कार समारंभ सामाजिक बांधिलकीचे एक उत्तम उदाहरण ठरला आहे.

Previous Post Next Post