गाडगेबाबांनी अज्ञान अंधश्रद्धे विरुद्ध समाजामध्ये जनजागृती केली. गजानन चौधरी गुरुजी यांनी त्याच वाटेने जावुन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य उपाध्यक्ष महादेवराव भुईभार यांनी केले.
पारवा येथे गजानन जनार्दन चौधरी गुरुजी यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सेवा संकल्प पूर्ती सोहळ्यात बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिखली झोलेबाबा येथील शेतीनिष्ठ शेतकरी अण्णाभाऊ चौधरी होते.कृषीतज्ज्ञ महादेवराव मुळे, महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस बबनराव कानकिरड, शंकरराव इंगळे,विजय पाटील कडू, सौ. शोभाताई चौधरी, श्रीमती सुनंदा चौधरी व डॉ. तुषारराव मुळे यांची याप्रसंगी विचारपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
लग्न, तेरवीवर होणाऱ्या अवाजवी खर्चाला आळा घालून तो पैसा मुला मुलींच्या शिक्षणावर खर्च करण्याचे आवाहन महादेवराव भुईभार यांनी याप्रसंगी केले.
जिल्हा परिषद शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक गजानन जनार्दन चौधरी गुरुजी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त महादेवराव भुईभार यांचे हस्ते शाल श्रीफळ भेटवस्तू देवुन सपत्नीक सत्कार करण्यात आला.पंचक्रोशीतील ग्रामस्थांनीही भेटवस्तू व पुस्तके देवुन गौरव केला.
अज्ञान ,अंधश्रद्धा सारख्या समस्यांचे उच्चाटन करण्यासाठी सुशिक्षितांनी पुढे येऊन समाजप्रबोधन करण्याची गरज आहे.गजानन चौधरी सत्यशोधक विचार पेरणारे अध्यापक असल्याचे प्रतिपादन बबनराव कानकिरड यांनी केले.
डॉक्टर ,इंजिनियर होण्यापेक्षा शेती- शिक्षणाची सांगड घालून आपण शिक्षकी पेशा स्वीकारला. शिक्षणाचा गंध नसलेल्या पालावरील भटक्या समूहातील मुलांच्या हाती पाटी पेन्सिल दिली.वंचित घटकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे भाग्य आपल्याला मिळाले यापुढेही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निरंतर धडपड करण्याचा संकल्प गजानन चौधरी गुरुजी यांनी सत्काराला उत्तरा दाखल भाषणातून केला.
कोणत्याही फळाची अपेक्षा न करता गजानन चौधरींनी शिक्षण सेवेची परिपूर्ती केली. गावाच्या विकासातही त्यांचा सक्रिय सहभाग असल्याचे प्रतिपादन अण्णाभाऊ चौधरी यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.
याप्रसंगी मराठा सेवा संघाचे प्रकाश धोटे ,रामेश्वर चारथळ, सौ.सुरेखा वानखडे, अलका कदम, वाघमारे मॅडम, नरेश देशमुख,नंदकिशोर भोयर,संजय भाकरे यांनी चौधरी गुरुजींनी शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेल्या सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांची माहिती समयोचित भाषणातून दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. सौ. अंकिता तुषारराव मुळे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. कु. गायत्री सुर्वे यांनी केले. आभार प्रदर्शन कार्तिक चौधरी यांनी केले.
कार्यक्रमास पंचक्रोशीतील ग्रामस्थ,शिक्षक, कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
Tags
अकोला...