> वारसांना सातबारावर नोंदणी करण्याची संधी
> १ ते ३१ मार्चपर्यंत कालबध्द कार्यक्रम
> चिखली तहसीलचा उपक्रम जिल्हास्तरावर
बुलढाणा, दि. १ : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात तहसीलदारांनी राबविलेल्या "जिवंत सातबारा मोहिमे"ची जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दखल घेत ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबतचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.
महसूल विभागाच्या १०० दिवस कृती कार्यक्रम आराखड्यांतर्गत १ मार्चपासून जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये या मोहिमेंतर्गत सातबारावरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मयत खातेदार यांच्या वारसांना शेत जमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. या दृष्टीकानातून या मोहिमेंतर्गत मयत खातेदारांच्या वारसाची नोंद करण्यात येणार आहेत.
या मोहिमेअंतर्गत कालबध्द कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. कालबद्ध कार्यक्रमानुसार प्रक्रिया:
>१ ते ५ मार्च दरम्यान ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी त्यांच्या साझा अंतर्गत येणाऱ्या मयत खातेदार यांची यादी तयार करणे.
>६ ते १५ मार्च दरम्यान वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे सादर करणे व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी स्थानिक चौकशी करुन मंडळ अधिकारी यांचे मार्फत वारस ठराव मंजूर करणे.
>१६ ते ३१ मार्च दरम्यान ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी वारस फेरफार तयार करुन मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफार मंजूर करणे.
ई-हक्क प्रणालीद्वारे अर्ज प्रक्रिया
यासोबतच, अर्ज प्रक्रिया पारदर्शक आणि सोपी करण्यासाठी ई-हक्क प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे. तसेच या कालबध्द कार्यक्रमात संबंधित तहसीलदारांना मोहिमेचे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली असून, त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात ही मोहीम वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
ही कागदपत्रे आवश्यक
खातेदाराचा मुळ किंवा प्रमाणित मृत्यू दाखला, सर्व वारसांच्या वयाच्या पुराव्याची साक्षांकित प्रत, सर्व वारसांच्या आधारकार्डची साक्षांकित प्रत, वारसाबाबत विहित नमुन्यातील शपथपत्र, स्वयंघोषणापत्र, अर्जातील सर्व वारसांचा पत्ता, भ्रमणध्वनी यांचा पुराव्यासह तपशील आवश्यक आहे.
नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन
ही विशेष मोहिम वारसांना शेतजमिनीशी संबंधित हक्क मिळवण्यासाठी मदत करेल. त्यामुळे ज्या वारसांची नोंद अद्याप सातबारावर झालेली नाही, त्यांनी मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.