चिखली : ग्रामविकास व पंचायत राज विभाग,महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण )(टप्पा दोन) सन २०२४-२५ अंतर्गत वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण व १० लाख लाभार्थ्यांना घरकुलाचा प्रथम हप्ता वितरण कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र सरकारतर्फे बालेवाडी पुणे येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आयोजित करण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील अनेक मंत्रीगन हजर होते. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून चिखली पंचायत समिती स्तरावर आ. श्वेताताई महाले यांच्यातर्फे विधानसभा मतदारसंघातील घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मंजुरपत्र वितरण कार्यक्रम चिखली पंचायत समिती मार्फत आयोजित केलेला होता.
सदर कार्यक्रमांमध्ये आ. श्वेताताई महाले यांनी शेकडो लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण केले. अभिमानाची गोष्ट ही की चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये रेकॉर्ड ब्रेक ९००० पेक्षा जास्त घरकुल मंजूर करण्यात आलेले आहे. चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या चिखली तालुक्यातील ग्रामीण भागासाठी सुमारे ६७२५ एवढे घरकुल मंजूर झाले असून, चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये असलेले परंतु बुलढाणा तालुक्यामध्ये येणाऱ्या ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी २४५४ एवढी घरकुले मंजूर झाली आहेत.
गरीबातील गरीबाचे देखील स्वतःाच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे हेच या शासनाचे अंतिम उद्दिष्ट आहे. देशातील प्रत्येक गरिबाला आपल्या हक्काचे घर मिळावे यासाठी हे शासन वचनबद्ध आहे, आणि नरेंद्र मोदी यांच्या या वचनाची पूर्तता करण्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हा वचनपूर्ती सोहळा आहे. ही वचनपूर्ती करत असताना सर्वसामान्यांच्या घराला अधिक मदत करता यावी या उदात्त ध्येयामूळेच मुख्यमंत्री यांनी अगोदर मंजूर अनुदानामध्ये सुमारे ५० हजार रुपयांची घसघशीत वाढ केली असल्याचे घोषित केले आहे. असे गौरव उदगार आ. श्वेताताई महाले यांनी काढले. याप्रसंगी त्यांनी नवनियुक्त गटविकास अधिकारी श्री गजानन पोफळे यांचेदेखील कौतुक केले.
राज्य शासनाच्या ‘सर्वांसाठी घरे’ या ध्येयाशी सुसंगत पद्धतीने विविध योजनांच्या माध्यमातून कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना इत्यादी योजना महाराष्ट्र शासनाकडून सुरु आहेत.या भव्य उपक्रमामुळे महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे.शासनाचा हा प्रयत्न केवळ निवारा देण्यासाठी नसून, एक सुरक्षित, सक्षम आणि समृद्ध जीवन घडवण्यासाठी आहे!आणी त्यासाठी शासन स्तरावर पूर्ण ताकदीने आपल्या मतदारसंघासाठी अधिक सुविधा खेचून आणण्याचा प्रयत्न आपण नेहमीच केला असून,घरकुल किंवा कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा जातीपातीचा कुठलाही भेदभाव न बाळगता खऱ्या गरजवंताला मिळण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नरत असल्याचे आणि कुठल्याही शासकीय योजना देतांना मध्यस्थ किंवा दलाल यांना फायदा देण्याऐवजी सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा मिळेल असेच आपले प्रयत्न असून यासाठी कुणी घरकुल किंवा इतर योजना मिळण्यासाठी पैसे मागत असतील तर त्यांची त्वरित तक्रार करा, अशा लोकांवर त्वरित कार्यवाही करण्यात येईल असे आ. श्वेताताई महाले यांनी सर्वांना आश्वस्त केले .