खामगाव - जालना रेल्वेमार्गाचा पाठपुरावा नीती आयोगाकडे सुरू आहे खा. प्रतापराव जाधव यांची रेल्वे लोकआंदोलन समितीला माहिती..

चिखली : बहुप्रतीक्षित खामगाव - जालना रेल्वेमार्गाला राज्य शासनाने ५० टक्के हिस्सा मंजूर केल्यानंतर आता हा प्रस्ताव दिल्ली येथील केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे दाखल झाला आहे. रेल्वे मंत्रालयाकडून केंद्रीय नीती आयोगाला प्रस्ताव सादर करण्यात आला असून या प्रस्तावामध्ये काही गोष्टींच्या बाबतीत स्पष्टीकरण नीती आयोगाकडून मागवण्यात आले आहे. त्याची पूर्तता करण्याची कार्यवाही सुरू आहे. लवकरात लवकर या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न आपण करत असल्याची माहिती खा. तथा केंद्रीय आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. दि. ३ जानेवारी रोजी चिखली येथे एका कार्यक्रमात ना. जाधव आले असता रेल्वे लोकआंदोलन समितीच्या सदस्यांनी त्यांची भेट घेतली घेऊन जाधव यांना निवेदन सादर केले; याप्रसंगी ते बोलत होते. खामगाव - जालना रेल्वेमार्गासाठी रेल्वे लोकआंदोलन समितीकडून मागील १८ वर्षापासून सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा केला जात आहे. गेल्या वर्षी ४२ दिवस सत्याग्रह आंदोलन समितीने केले होते. त्याची फलनिष्पत्ती म्हणून महाराष्ट्र शासनाने या रेल्वे मार्गासाठी ५० टक्के निधी मंजूर करत असल्याचे पत्र केंद्र सरकारला पाठवले. त्यानंतरची प्रक्रिया दिल्लीत सुरू आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून खामगाव - जालना रेल्वेमार्गाबाबतचा प्रस्ताव केंद्रीय नीती आयोगाकडे सादर करण्यात आला. या प्रस्तावामध्ये नीती आयोगाच्या दिशानिर्देशानुसार काही मुद्द्यांबाबत स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयाकडून मागवण्यात आले आहे. त्या संदर्भात रेल्वे मंत्रालयाने आपली कार्यवाही सुरू केली असून लवकरच नीती आयोगाकडे याबाबत आकडेवारीसह स्पष्टीकरण सादर करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. या रेल्वेमार्गाचा सातत्याने पाठपुरावा केला जात असून आगामी अर्थसंकल्पात या रेल्वे मार्गाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे ना. जाधव म्हणाले. यावेळी रेल्वे लोकआंदोलन समितीच्या वतीने प्रतापराव जाधव यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. डॉ. किशोर वळसे, रेणुकादास मुळे, संतोष लोखंडे, सतीश शिंदे, कैलाश शर्मा आणि असलम हिरीवाले यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
Previous Post Next Post