महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आ. श्वेताताई महाले यांचे कौतुक...
ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांना तलाठी, तहसील ऑफिस येथे वारसनोंदी करण्याकरिता माराव्या लागणाऱ्या चकरा, त्यामध्ये त्याची आर्थिक व मानसिक होणारी कुचंबना,हा त्रास टाळण्यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेताताई विद्याधर महाले यांनी,चिखलीचे तहसीलदार यांना सोबत घेऊन संपूर्ण चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये जिवंत सातबारा मोहीम दी. 1 मार्च पासून सुरु केली.आणि अवघ्या दीड महिन्यामध्ये संपूर्ण चिखली विधानसभा मतदारसंघातील मयत वारसांच्या सातबारावर त्यांच्या वारसांच्या नोंदी झाल्या.
हा अतिशय नाविन्यपूर्ण व शेतकऱ्यांच्या कल्याणाचा प्रकल्प संपूर्ण राज्यभरात राबवता येईल या अनुषंगाने सौ श्वेताताई महाले यांनी राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांना या प्रकल्पाबाबत माहिती दिली होती.
या संपूर्ण योजनेचा अभ्यास केल्यानंतर महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही योजना अतिशय नाविन्यपूर्ण व पथदर्शी असल्याने संपूर्ण राज्यभरात ही योजना लागू करता येईल, या दृष्टीने शासनाचा जी.आर. आज सभागृहात प्रसिद्ध केला.या योजनेच्या अनुषंगाने एक समाजाभिमुख उपक्रम सौ. श्वेताताई महाले आणी चिखलीचे तहसीलदार यांनी राबविला असून यासाठी सौ.श्वेता ताई महाले यांनी तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याशी विविध बैठका घेतल्या, आणि चिखली मतदारसंघांमध्ये ही योजना अतिशय सक्षमपणे व यशस्वीपणे राबवून घेतली.अशाच प्रकारे राज्यभरातील सर्व मतदारसंघातील सर्व आमदारांनी आपल्या भागामध्ये तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याशी बैठकी घेऊन या योजनेला प्रसिद्धी द्यावी व ही योजना यशस्वी करावी.असे आवाहनही महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.या योजनेला राज्यभरात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने याचा योग्य आराखडा,व त्यामध्ये काही आणखी सुधारणा करता येतील का? या दृष्टीने सभागृहात चर्चेसाठी हा विषय घेण्यात आला असता,अगदी विरोधी पक्षातील सन्माननीय सदस्यांनी सुद्धा या योजनेचे तोंडभरून कौतुक केले.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना म्हणजे त्यांना घरपोच वारसा नोंद होण्यासारखे असून,शहरी भागातील मयत व्यक्तींच्या वारसांना सुद्धा अशा प्रकारे सुटसुटीत व लवकर वारसा नोंद प्राप्त व्हावी अशी इच्छाही काही सदस्यांनी व्यक्त केली.