प्रधानमंत्री आवास योजना ( शहरी) २.० मधून गरजूंना मिळणार हक्काचे घरकुल






चिखली : " सर्वांसाठी घरे  "  ह्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी  प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात देशभर झाली. या योजनेचा दुसरा टप्पा कार्यान्वित झाला असून यामधून शहरी भागातील गरजूंना हक्काचे घरकुल उपलब्ध होणार आहे.  त्याकरिता पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह त्वरित अर्ज करावे व या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.  श्वेताताई महाले यांनी केले आहे. 
              पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या   "सर्वांसाठी घरे" या संकल्पनेच्या अंतर्गत केंद्रीय  गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाकडून  केंद्र पुरस्कृत "प्रधानमंत्री आवास योजना" सुरु करण्यात आली. या योजनेची राज्यात अंमलबजावणी  डिसेंबर, २०१५ पासून करण्यात आली. सदर योजनेची मुदत दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपुष्टात आली. मात्र, अजूनही देशात परवडणाऱ्या घरांची मागणी विचारात घेऊन केंद्र शासनाने दि. १ सप्टेंबर २०२४ पासून "प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०" ची देशात अंमलबजावणी करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. ज्याअंतर्गत एक कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच, भाडे तत्वावर परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या "प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०" च्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर योजना राज्यात राबवण्याचे प्रस्तावित होते. राज्य सरकारने दि. १५  ऑक्टोबर २०२४  पासून या योजनेची राज्यभरात अंमलबजावणी सुरू केली आहे. 

       कोण घेऊ शकेल योजनेचा लाभ ? 

                 प्रधानमंत्री आवास योजना शहरी २.० या योजनेचा लाभ घेण्यासाठी  अर्ज करणाऱ्याच्या  कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावाने पक्के घर नसावे, मागील वीस वर्षात अर्जदाराने किंवा त्याच्या कुटुंबीयांनी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा, अर्जदाराचे  वार्षिक उत्पन्न ४.५ लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. 

ऑनलाइन नोंदणी करून न, प. कार्यालयशी संपर्क साधा 

           आ. श्वेताताई महाले यांच्या मार्गदर्शनात  प्रधानमंत्री आवास योजना ( शहरी ) २.० नगरपालिका हद्दीत प्रभावीपणे राबवली जात आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने आपले आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, बँकेचे पासबुक, मोबाईल नंबर, जमिनीच्या मालकी हक्काचा पुरावा जसे खरेदीखत, पी आर कार्ड, असेसमेंट नक्कल आदी, आई - वडिलांचे आधार कार्ड, स्वतःचे पॅन कार्ड  अशी  कागदपत्रे जोडून योजनेचा लाभ मिळण्याबाबतचा अर्ज नगरपालिका कार्यालयाकडे जमा करावा. तत्पूर्वी या सर्व कागदपत्रांसह
https://pmaymis.gov.in/PMAYMI>2_2024/PmayDefault.aspx 
या पोर्टलवर ऑनलाइन पध्दतीने  नोंदणी करणे गरजेचे आहे.  योजनेसंदर्भात कोणतीही  समस्या उत्पन्न झाल्यास अर्जदारांनी नगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या कार्यालयाशी देखील प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत बिडकर यांनी केले आहे. 

     यांना मिळणार अतिरिक्त लाभ

       प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना २.५ लाख रुपयांचे अनुदान  देण्यात  येते. परंतु, पीएम स्वनिधी योजना, इमारत बांधकाम कामगारांच्या योजना व विश्वकर्मा योजनेअंतर्गत नाव नोंदणी केलेल्या लाभार्थींना  दोन लाख रुपयांचे अतिरिक्त अनुदान देखील देण्यात येणार आहे. याशिवाय घराच्या बांधकामासाठी प्रत्येकी पाच ब्रास वाळू देखील लाभार्थ्याला उपलब्ध करून दिली जाईल. 

पात्र गरजूंनी योजनेचा लाभ घ्यावा -  आ. श्वेताताई महाले

        "  सबका साथ, सबका विकास,   सबका विश्वास " या त्रिसूत्रीनुसार गेल्या दहा वर्षांपासून देशात कल्याणकारी शासन चालवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिक व गोरगरीब जनतेच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजना ही त्यातील एक महत्त्वाची  योजना असून  ' विकसित राष्ट्र '  ही  देशाची नवी ओळख जगाच्या नकाशावर निर्माण करणारा हा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प असल्याचे मत आ. श्वेताताई महाले यांनी या  योजनेबद्दल व्यक्त केले आहे.  चिखली मतदारसंघात  चिखली नगरपालिकेच्या  हद्दीतील रहिवासी असलेल्या प्रत्येक पात्र गरजूला   या योजनेचा लाभ मिळावा  यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश आपण नगरपालिका प्रशासनाला दिले असून आवश्यक ते सर्व सहकार्य देखील केले जाणार आहे. तरी पात्र गरजूंनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपली कागदपत्रे व नाव नोंदणीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी व या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.  श्वेताताई महाले यांनी केले आहे.

Previous Post Next Post